Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बहुतांश राज्यांनी रात्रीची संचारबंदी तसेच लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे देशात बहुतांश नागरिकांच्या रोजगारावर परिणाम पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोष्टीचा विचार करुन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून देशातील जवळपास 80 कोटी लोकांना दोन महिन्यांसाठी मोफत राशन दिले जाणार आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गतही मदत दिली जाणार आहे. तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
5 किलो धान्य मोफत मिळणार
मागील वर्षी लॉकडाऊन लागू केल्यानंतर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली होती. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आहे. त्यामुळे याच योजनेंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून मोफत धान्य मिळणार आहे. या वर्षीच्या मे आणि जून अशा एकूण दोन महिन्यांमध्ये लाभार्त्यांना 5 किलो धान्य मोफत मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एकूण 26 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मागील लॉकडाऊनमध्ये योजनेची सुरुवात
मागील वर्षी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल झाले होते. अनेकांचे रोजगार गेले होते. तर कित्येक लोकांच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली होती.
स्थलांतराचे प्रमाण वाढले
सध्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. रोज लाखोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या रुग्णांचा आलेख वरच जाताना दिसतोय. याच कारणामुळे देशात अनेक राज्यांना नाईट कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करु शकतं असं अनेकांना वाटत आहे. परिणामी स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे.
लॉकाडाऊन हा शेवटचा पर्याय
देशात लॉकडाऊन लागू होतो की काय अशी भीती अनेकांना वाटत असली तरी लॉकडाऊन हा अगदी शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केले आहे. त्यामुळे देशपातळीवर लॉकडाऊन लागू केला जाणार नाही असेसुद्धा अनेकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे अनेकांच्या रोजगारावर पुन्हा कुऱ्हाड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकांना मोफत धान्य देण्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
#solapurcitynews